Thursday, 29 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘भगवान महावीर अहिंसेचे मुर्तीमंत प्रतिक’


जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मुर्तीमंत प्रतिक होते. भगवान महावीर 28 वर्षाचे असतांना त्यांच्या आई वडीलांचा मृत्यू झाला. वयाच्या तीसाव्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत. काही दिवसांनी त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यांनी बारा वर्षापर्यंत मौन पाळले होते. त्यानंतर भगवान महावीरांना केवल ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर जनकल्याणासाठी त्यांनी उपदेश सुरू केला. विचारांतून समाजाचे प्रबोधन होते. आणि त्यातून संपन्न आणि समृद्ध समाजाची निर्मिती होते यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
भगवान महावीरांनी प्रवचनातून अहिंसा सत्य अपरिग्रह, त्यांग, संयम, प्रेम, करूणा, शील, सदाचार यांवर समाजाला मार्गदर्शन केले. आणि त्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. जीवन शुद्ध पाण्यासारखे असावे असे ते म्हणत. समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे महावीरांनी सांगितले. सत्य हेच खरे तत्त्व आहे व समाजहिताचा विचार करा हा महावीरांचा संदेश आहे. महावीर म्हणतात की, आपण क्षमा केल्यामुळे सर्व सजीवांना अभय देऊन त्यांच्या रक्षणाचा संकल्प केला पाहिजे. जेव्हा आपण संयम आणि विवेकाचे अनुसरण करतो तेव्हाच आत्मिक शांतीचा अनुभव घेऊ शकतो. 
सर्व सजीवांप्रती मैत्रीची भावना ठेवणे आपले कर्तव्य आहे. आपण बाहेर कुठेही हस्तक्षेप न केला आणि बाहेरील तत्वापासून विचलित न झाल्यास आत्मा शुद्ध होऊ शकतो. क्षमाभाव याचा मूलमंत्र आहे. भगवान महावीरांनी मन अहिंसक बनवण्यासाठी लोकांना तप, अहिंसा व साधना यांचा मार्ग दाखवून त्यांना सत्याप्रत पोहोचवले. मनावर विजय मिळवण्यासाठी क्रोधाला जिंकता आले पाहिजे. भगवान महावीरांनी आंतरीक गुणांच्या सामर्थ्यावर नैतिक धारणा व व्यावहारीक जीवन यांचा समतोल घडवून आणला. 

त्यामुळे लोकजीवनात सामाजिक एकोपा राहिला आहे. खर्‍या अर्थाने मानवतावादाकडे जाण्याचा मार्ग भगवान महावीरांनी आपल्याला दिला आहे. त्याची जोपासना करूया.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment